Weather Update: देशभरात सध्या हवामानाचा खेळ सुरू असून कधी थंडी तर कधी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असून तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत अचानक गारठा वाढतोय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडाही जाणवत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून सामान्य जनतेसह शेतकरी आणि प्रवाशांची चिंता वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. 12 जानेवारी रोजी देशातील चार राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात 50 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि पुद्दुचेरी या राज्यांसाठी हवामान विभागाने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून तिथे कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. पारा सातत्याने घसरत असून अनेक शहरांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होत आहे. हवामान विभागाने उत्तर भारतातील तब्बल 17 शहरांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. थंडी वाढल्यामुळे वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत असून आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Weather Update
महाराष्ट्रातही हवामानाचा लहरीपणा कायम आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळी गारठा आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे नागरिक हुडहुडीचा अनुभव घेत आहेत. पुण्यात 9.9 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले असून थंडीचा जोर चांगलाच जाणवतोय. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता असून थंडी काहीशी ओसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील तापमानाचा विचार करता धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून तिथे पारा थेट 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. परभणी येथे 6.6 अंश, अहिल्यानगरमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. जळगाव, पुणे, मालेगाव, भंडारा, नाशिक आणि गोंदिया या भागांत तापमान जवळपास 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा धोका तर दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याची थंडी, अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. पुढील 24 ते 48 तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
1 thought on “पुढील 24 तास धोक्याचे! ‘या’ 4 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा..”